पुणे : ‘आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’ संस्थेच्या रौप्यमहोत्सवाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेली पुणे ते गोवा सायकल मोहीम बुधवारी, नऊ जानेवारी रोजी यशस्वीरीत्या पूर्ण झाली. या मोहिमेत विद्यार्थी, सहाय्य्क कर्मचारी, प्रशासकीय सेवक मिळून ६१ जण सहभागी झाले होते. या सायकलपटूंनी ४९२ किलोमीटरचा हा प्रवास पुणे-कराड-कोल्हापूर-बेळगाव मार्गाने चार दिवसात पूर्ण केला. हे सायकलपटू नऊ जानेवारी रोजी गोव्यातील बांबोळी येथील लष्कराच्या सिग्नल ट्रेनिंग सेंटरला पोहोचले.
या मोहिमेची सुरुवात शनिवारी, पाच जानेवारी रोजी संस्थेच्या दिघी येथील आवारातून झाली. संचालक ब्रिगेडिअर अभय भट यांनी सायकलपटूंना निरोप दिला. या वेळी संस्थेतील विद्यार्थी, अध्यापक आणि प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. एआयटीचे सहसंचालक कर्नल के. ई. विजयन यांच्या पुढाकाराने ही सायकल मोहीम पार पडली.
‘अशा उपक्रमांतून तरुण पिढीला भविष्यात संभाव्य कठीण आव्हानांना सामोरे जाण्याची मानसिक आणि शारीरिक ताकद मिळते’, असे कर्नल विजयन म्हणाले.
संस्थेचे संचालक ब्रिगेडिअर अभय भट हे स्वतः मोहिमेच्या पुणे-सुरूर या ९२ किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यात सहभागी झाले होते. बांबोळी येथे स्टेशन कमांडर आणि सिग्नल ट्रेनिंग सेंटरचे कमांडंट यांनी मोहिमेतील सायकलपटूंचे स्वागत केले.
ब्रिगेडिअर भट म्हणाले, ‘आमच्या संस्थेच्या दृष्टीने हा संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त आयोजित झालेला एक सन्मानाचा योग आहे. या २५ वर्षात संस्थेच्या विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती आणि विकास व्हावा यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहिलो आहोत. विद्यार्थ्यांमध्ये साहसाची आवड उत्पन्न व्हावी आणि त्यांना सर्वांगीण शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व पटावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सायकल मोहिमेमुळे आमची विद्यार्थ्यांना सर्वोत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देण्यावर असलेली निष्ठा अधोरेखित झाली आहे. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि निग्रहामुळे ही मोहीम यशस्वीपणे पार पडली. आमच्या विद्यार्थ्यांनी ‘ऑनवर्ड टु ग्लोरी’ (कीर्ती शिखराकडे वाटचाल) हे ध्येय या मोहिमेद्वारे सिद्ध केले.’
एआयटी सायकलिंग क्लबचे सचिव सार्थक वासुदेवा म्हणाले, ‘संस्थेच्या या पहिल्या सायकल मोहिमेत सहभागी होताना आम्ही अत्यंत उत्साहात होतो. या मोहिमेसाठी आम्ही गेले दोन महिने कसून तयारी आणि प्रशिक्षण घेतले. त्यामुळे ही मोहीम आम्ही नियोजित वेळी पूर्ण करू शकलो. मानसिक बळ, चिकाटी आणि दुर्दम्य इच्छाशक्ती यांचे अशा मोहिमेच्या दृष्टीने महत्त्व किती मोठे आहे हे आम्ही या प्रशिक्षणादरम्यान शिकलो.’